स्पर्धा परीक्षांचे महत्व बरेच वाढले आहे. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासकीय सेवेतील मोठी पदे मिळवण्यासाठी विद्यार्थी शाळेपासूनच या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला लागतात . यामध्ये विद्यार्थी प्रामुख्याने यूपीएससी / एमपीएससी चा अभ्यास करताना दिसतात. पण ही 'एमपीएससी' नेमकी आहे काय.. हे जाणून घेऊया.
⦁ MPSC पूर्ण फॉर्म (Full form of MPSC)
एमपीएससी (MPSC)चा फुल फॉर्म आहे Maharashtra Public Service Commission म्हणजे ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग’. या आयोगा मार्फत जी परीक्षा घेतली जाते तिला एमपीएससी परीक्षा म्हणतात.
⦁ महाराष्ट्र लोकसेवा आयोग बद्दल थोडक्यात माहिती
‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग’ ही भारतीय राज्यघटनेने कलम ३१५ अन्वये निर्माण केलेली सरकारी संस्था आहे. जी महाराष्ट्र राज्यातील नागरी सेवेतील अधिकारी पदांच्या भरतीसाठी परीक्षेचे आयोजन करते. त्यानंतर उमेदवारांची गुणवत्ता आणि राज्याच्या आरक्षणाच्या पूर्व-निर्धारित नियमांच्या आधारे या पदांची भरती केली जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यातील विविध प्रशासकीय विभागात वर्ग-3 पासून वर्ग-1 पर्यंतच्या अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाते. आयोगाच्यावतीने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून राज्य सेवा परीक्षा, विक्रीकर निरीक्षक परीक्षा, पोलिस उपनिरीक्षक परीक्षा, मंत्रालयीन सहायक, महाराष्ट्र वन सेवा परीक्षा, महाराष्ट्र अभियंत्रिकी सेवा परीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा, न्यायलयीन सेवा परीक्षा, मोटर वाहन निरीक्षक परीक्षा, लिपीक-टंकलेखक परीक्षा आदी व सरळ सेवेतून विविध पदाच्या परीक्षा सामान्य राज्य सेवा चाचणी परीक्षा घेतली जाते. तसेच प्रशासकीय सेवेतील विभागांतर्गत परीक्षा घेतल्या जातात. आयोगाच्या वतीने राज्यसेवा परीक्षेमधून अधिकारी होण्याकरिता पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यातून यावे लागते. राज्यसेवा परीक्षेतून राज्य शासनाच्या सेवेतील अतांत्रिक राजपत्रित गट-अ व ब या संवर्गातील पुढील पदे शासनाच्या मागणीनुसार व पदांच्या उपलब्धेनुसार भरण्यात येतात.
⦁ महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अंतर्गत या पदांसाठी परीक्षा घेतल्या जातात.
1. राज्यसेवा परीक्षा
2. महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
3. महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
4. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा
5. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा
6. दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा
7. साहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा
8. पोलीस उपनिरीक्षक परीक्षा
9. विक्रीकर निरीक्षक परीक्षा
10. साहाय्यक परीक्षा
11. लिपिक-टंकलेखक परीक्षा
⦁ राज्यसेवा
राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या सेवेतील, राजपत्रित गट ‘अ’ व गट ‘ब’ संवर्गातील खालील विविध पदांसाठी एकच परीक्षा घेतली जाते. ज्यामध्ये पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या संपूर्ण प्रक्रियेमधून उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराची निवड केली जाते.
राज्यसेवा गट अ आणि ब च्या अंतर्गत येणारी पदे...
1. उपजिल्हाधिकारी (गट अ)
2. पोलीस उपअधीक्षक/साहाय्यक पोलीस आयुक्त (गट अ)
3. साहाय्यक विक्रीकर आयुक्त (गट अ)
4. उपनिबंधक, सहकारी संस्था (गट अ)
5. उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी (गट अ)
6. महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट अ)
7. मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट अ
8. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (गट अ)
9. तहसीलदार (गट अ)
10. साहाय्यक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, (गट ब)
11. महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट ब)
12. कक्ष अधिकारी (गट ब)
13. गटविकास अधिकारी (गट ब)
14. मुख्याधिकारी, नगरपालिका/नगर परिषद, (गट ब)
15. साहाय्यक निबंधक सहकारी संस्था (गट ब)
16. उपअधीक्षक, भूमी अभिलेख (गट ब)
17. साहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, (गट ब)
18. नायब तहसीलदार (गट ब)
⦁ या परीक्षेचे तीन टप्पे आहेत.
1. पूर्व परीक्षा (400 गुण)
2. मुख्य परीक्षा (800 गुण)
3. मुलाखत (100 गुण)
⦁ राज्यसेवा (पूर्व) परीक्षा माहिती
राज्यसेवा परीक्षेतील (राजपत्रित अधिकारी) हे महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे पद समजले जाते. ही परीक्षा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते. पूर्व परीक्षा 400 गुणांची असते.
पेपर 1 सामान्य अध्ययन – गुण 200
वेळ 2 तास. यामध्ये चालू घडामोडी, आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह, भारताचा स्वातंत्र्य लढा, भूगोल – महाराष्ट्र, भारत आणि जग, भारताचे संविधान, पंचायती राज, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, अर्थशास्त्र – सामाजिक विकास, दारिद्रय आणि बेरोजगारी, पर्यावरण परिसंस्था, जैवविविधता आणि सामान्य विज्ञान या विषयावर प्रश्न विचारले जातात.
पेपर 2 – गुण 200 – वेळ 2 तास
यामध्ये प्रामुख्याने तर्कशक्ती, निर्णय क्षमता, सामान्य बुद्धिमापन चाचणी, अंकगणित (दहावी स्तर), मराठी आणि इंग्रजीमधील सुसंवाद कौशल्य, व्याकरणावर प्रश्न विचारले जातात.
⦁ मुख्य परीक्षा माहिती
राज्यसेवा (राजपत्रित) मुख्य परीक्षेत विद्यार्थ्यांची खरी कसोटी लागते. ही परीक्षा 800 गुणांची असून यामध्ये चार पेपर असतात. प्रत्येक पेपरला 150 गुण, यामध्ये इतिहास, भूगोल, महाराष्ट्राच्या संदर्भासह आधुनिक भारताचा इतिहास, भारतीय संविधानाचा प्राथमिक अभ्यास, भारतीय राजकारण महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह, मानवी संसाधन आणि मानवी हक्क, अर्थव्यवस्था व नियोजन तसेच विकास विषयक अर्थशास्त्र, कृषी आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवर प्रश्न विचारले जातात. मराठी आणि इंग्रजी भाषा यावर प्रत्येकी 100 गुणांचा पेपर असतो. यामध्ये निबंधलेखन, उतारा प्रश्न, व्याकरण यावर प्रश्न विचारले जातात. अंतिम निवडीसाठी 100 गुणांची मुलाखत प्रकिया पार पाडावी लागते.
पीएसआय,एसटीआय आणि सहाय्यक : (PSI, STI AND ASSISTANCE)
मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात किंचित बदल वगळता या परीक्षांचे स्वरूप एकसारखेच असते. मंत्रालयीन सहायक या पदाला मुलाखत नसून अंतिम परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड केली जाते. पोलीस उपनिरीक्षक (शारीरिक चाचणीसह) आणि विक्रीकर निरीक्षक यांना मुलाखतीची प्रक्रिया पार पाडावी लागते. पोलीस उपनिरीक्षक/विक्रीकर निरीक्षक/सहाय्यक या पदासाठी पूर्व परीक्षा 100 गुणांची असते. तीनही पदांसाठी पूर्व परीक्षेचे स्वरूप सारखेच असते. प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात. यामध्ये चालू घडामोडी, नागरिकशास्त्र, भारतीच घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन, ग्रामव्यवस्थापन, इतिहास भूगोल राज्याच्या संदर्भासह, पृथ्वी, हवामान, अक्षांश, रेखांश, जमिनीचे प्रकार, प्रमुख पिके, पर्जन्यमान, शहरे, नद्या, उद्योगधंदे, अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखापरीक्षण, सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, आरोग्यशास्त्र, बुद्धिमापन आणि अंकगणित या विषयावर प्रश्न विचारले जातात.
मुख्य परीक्षा :
वरील तीनही पदांसाठी मुख्य परीक्षेला दोन पेपर असतात. यामध्ये पेपर क्रमांक 1 भाषा असून यामध्ये इंग्रजी या विषयावर 40 गुणांचे तर मराठी विषयावर 60 गुणांसाठी असे एकूण 100 प्रश्न विचारले जातात. यामध्ये व्याकरण, उतारा प्रश्न, वाक्यरचना, म्हणी, शब्दसंग्रह यावर प्रश्न आधारित असतात. पेपर 2 – हा सामान्य अध्ययन 100 गुणांचा असतो. या पेपरमध्ये सर्वसाधारण चालू घडामोडी, राज्य ते जागतिकस्तरावरील, बुद्धिमापन चाचणी, भूगोल भारत आणि जग (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह), इतिहास, माहिती अधिकार, सामाजिक सुधारणा चळवळी, भारताचे संविधान, मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या, महिला संरक्षण, घरगुती हिंसाचार कायदा, कृषी, तंटामुक्ती अभियान, संगणक व माहिती तंत्रज्ञान, अट्रोसिटी, मुंबई पोलीस कायदा, पुरावा कायदा, सीआरपीसी आणि आयपीसी यावर प्रश्न विचारले जातात.
मुख्य परीक्षेमध्ये विक्रीकर निरीक्षक आणि मंत्रालयीन सहायक या पदांसाठी पोलीस संदर्भात अभ्यासक्रम तसेच संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयाऐवजी लेखाकर्म या विषयावर प्रश्न विचारले जातात. पोलीस उपनिरीक्षपदाची मुलाखत 50 गुणांची असून शारीरिक चाचणी 100 गुणांची असते. ही सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर अंतिम निवड केली जाते.
⦁ एमपीएससी परीक्षेचा अभ्यासक्रम (Syllabus of MPSC)
‘एमपीएससी’ परीक्षेचे दोन टप्पे असतात एक पूर्वपरीक्षा आणि दुसरी मुख्य परीक्षा.
पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण झालेला उमेदवारच मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतो.
या परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाने खालील निश्चित केला आहे. हा पॅटर्न बऱ्याच अंशी यूपीएससीसारखा आहे. अभ्यासक्रम आणि त्याचे स्वरूप- पूर्व परीक्षेसाठी प्रत्येकी २०० गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका असतील. दोन तास वेळ असेल. या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (मराठी व इंग्रजीत) असतील.
पेपर- एक (गुण २००-दोन तास)
राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी. भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ.
महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल- भौतिक, सामाजिक आणि आर्थिक.
महाराष्ट्र व भारत- राज्यव्यवस्था आणि शासन- राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, शहरी प्रशासन, शासकीय धोरणं, हक्कविषयक घडामोडी इत्यादी
आर्थिक आणि सामाजिक विकास- शाश्वत विकास, गरिबी, समावेशन, लोकसंख्याविषयक मुद्दे, सामाजिक धोरणे इत्यादी पर्यावरणीय परिस्थिती, जैव विविधता, हवामान बदल यामधील सर्वसामान्य मुद्दे, सामान्य विज्ञान
(रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र)
पेपर- दोन (गुण २००- दोन तास)
इंटरपर्सनल स्किल्स (कम्युनिकेशन स्किलसह) : तर्कशुद्ध युक्तिवाद आणि मीमांसा/पृथ:करण क्षमता (लॉजिकल रिझनिंग आणि अॅनालिटिकल अॅबिलिटी), निर्णय क्षमता व प्रश्नांची उकल (डिसिजन मेकींग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग), सामान्य बुद्धिमापन क्षमता (जनरल मेंटल एबिलिटी), बेसिक न्यूमरसी, डेटा इंटरप्रिटेशन (चार्ट, ग्राफ, टेबल्स) (दहावीचा स्तर असेल), इंग्रजी व मराठी भाषा आकलन क्षमता- कॉम्प्रिहेन्शन स्किल (दहावी स्तर)
कॉम्प्रिहेन्शन : यात आकलन क्षमतेची परीक्षा घेतली जाते. उताऱ्यावरील प्रश्न, पॅराग्राफ उलटेसुलटे करुन त्याची संगती लावणे, वाक्यरचना ओळखणे, योग्य शब्दाची निवड करणे, समानार्थी-विरुद्धार्थी शब्द लिहीणे अशा अनेक गोष्टी त्यात येतात.
लॉजिकल रिझनिंग आणि अनॅलॅटिकल अबिलिटी :यामध्ये एखाद्या गोष्टीचा तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता जोखली जाते. दोन विधानांचा परस्परसंबंध, त्यावरचे अनुमान काढावे लागतात.
डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग : प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना सतत विविध प्रश्नांना-समस्यांना सामोरे जावे लागते. त्यावेळी समस्येचा सर्वांगीण विचार करून योग्य, अधिकाधिक जनतेला उपयोगी ठरेल, असा निर्णय घ्यावा लागतो. यातील काही प्रश्न हे क्षमतेची चाचपणी करणारे असतील.
जनरल मेंटल एबिलिटी : आत्तापर्यंत सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये या घटकाचा समावेश असे. आता नवीन पेपर (पेपर दोन) मध्ये याचा समावेश आहे.
गणित व बुद्धिमत्ता : काळ, काम, वेग, गुणोत्तर, कोडिंग, डिकोडिंग, प्रोबॅबिलिटी, घड्याळ, कॅलेंडर, दिशा आदींवर आधारित प्रश्न असतात.
Tags:
Information
